बौद्ध धम्म आणि आषाढ पौर्णिमा | आषाढ पौर्णिमा बौद्ध धम्मातील महत्वाचा दिवस | Aashadh Poornima In Buddhism
भारताच नाही तर प्रबुद्ध जगात बारा पौर्णिमाना खूप महत्व आहे, जानेवारी ते डिसेंबर या बारा महिन्याच्या कालावधीत पौष पौर्णिमा, माघ पौर्णिमा, फाल्गुन पौर्णिमा, चैत्र पौर्णिमा, वैशाख पौर्णिमा. जेष्ठ पौर्णिमा, आषाढ पौर्णिमा, श्रवण पौर्णिमा, भाद्रपद पौर्णिमा, आश्विन पौर्णिमा, कार्तिक पौर्णिमा, आणि मार्गशीर्ष पौर्णिमा, या बारा पौर्णिमाना बौद्ध राष्ट्रांत मोठ्या आनंदाने, मंगलमय वातावरणात पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून साजऱ्या केल्या जातात, त्यापैकीच एक म्हणजे आषाढी पौर्णिमा, तसे पाहिले तर जुलै महिन्यातील प्रत्येक दिवस महत्वाचा आहे पण सर्वात महत्त्वाचा दिन म्हणजे आषाढ पौर्णिमा. या दिवशी बुद्धांच्या जीवनात आणि धम्मात अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या आहेत. धम्म साहित्यात या घटनांचा उल्लेख आढळून येतो. असे सांगितले जाते की,
- या दिवशी राणी महामायेला गर्भ संभव झाला, म्हणून जगात या पौर्णिमेला गर्भ मंगल दिन म्हणून साजरे करतात.
- जेव्हा शाक्य आणि कोलीय यांच्यात रोहिणी नदीच्या पाणी वाटपावरून वाद झाला तेव्हा शाक्यांच्या सेनापतीने कोलीयांशी युद्ध पुकारण्याच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी अधिवेशन बोलाविले होते. सेनापतीने कोलियांच्या विरुद्ध युद्ध करावे असा ठराव मांडला, गौतम बुद्धांनी या ठरावाचा जोरदार विरोध केला, त्यांचा मते युद्धाने प्रश्न कायमचे सुटत नसतात. एका युद्धाने दुसऱ्या युद्धांची बीजे रोवली जातात. प्रश्न सामंजस्याने व विवेकाने सोडवायला हवे, सिद्धार्थ गौतमाने ठरावाला विरोध करून शाक्य संघाच्या नियमांचे उल्लंघन केले होते. त्याना शिक्षेचा सामना करावा लागला, शाक्य संघाच्या शिक्षेनुसार देश त्याग करण्याची त्यांनी तयारी केली, गौतमाच्या गृहत्याग दिनाला महाभिनिष्क्रमन दिन म्हणतात. ही घटनाही आषाढी पौर्णिमेलाच घडली.
- गृहत्याग केल्यानंतर, अनेक वर्षे त्यांनी त्यानी अनेक विषयांवर चिंतन केले, त्यांना सम्यक संबोधी प्राप्त झाली, त्यांना विश्व कल्याणाचा धम्म शोध लागला, ते सारनाथ मधील इसिपतनच्या मृगदाय वनात गेले. या मृगदाय वनात त्यांनी, प्रथम भद्रीक, अश्वजित, महानाम, कौडिण्य, व कश्यप या पाच जणांसमोर प्रथम प्रवचन दिले. या प्रवचनात त्यांनी पंचशील. महान अष्टांगिक मार्ग, आणि प्रज्ञायुक्त दस पारिमितांचा मार्ग, यावर भाष्य केले, या पाच जणांवर त्यांच्या प्रवचनाचा प्रभाव पडला, ते बुद्धांचे अनुयायी झाले, या प्रथम प्रवचनालाच थम्म उदय दिन म्हणजेच धम्मचक्र प्रवर्तन दिन होय, आषाढी एकादशीला बुद्धांनी धम्मचक्र गतिमान केले. म्हणून या दिवशी त्याकाळी लोक विहारात जावून प्रवचनाचा लाभ घेत होते. त्या प्रथेचे स्वरूप बदलले असले तरी आजही लोक आषाढी पौर्णिमेला वाऱ्या काढताना दिसत आहे या वाऱ्यांचे आणि पालख्या निघत आहेत याचे बीज धम्मचक्र प्रवर्तनदिनातुन निघाले आहे. अशा प्रकारे आषाढी पौर्णिमेला धम्माशी निगडित अत्यन्त महत्वाची घटना घडली होती, याच दिवशी बुद्धांना, त्यांच्या पाच शिष्यांनी गुरू म्हणून स्वीकारले होते खरी गुरू पौर्णिमा भारतात ही पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते.
- बुद्धांनी आपल्या साठ भिक्षूचा संघ आषाढी पौर्णिमेला स्थापन केला. जगातील सर्वात पहिल्या भिख्खू संघाची स्थापना ज्या दिवशी झाली तो दिवस आषाढी पौर्णिमा होता.
- भगवान बुद्ध दररोज पायी प्रवास करून भिख्खूना धम्म समजावून सांगत असत, धम्म हा मानवाचे खऱ्या अर्थाने कल्याण करणारा आहे. ते पटवून देत असत. संघ स्थापन केल्यानंतर जास्तीत जास्त लोकांपर्यंत धम्म पोहोचावा म्हणून तथागत बुद्धांनी भिख्खूना चरक भिक्खवे चारिक बहुजन हिताय बहुजन सुखाय... परियोसन कल्याण असा आदेश दिला. बुद्धांचा आदेश प्रमाण मानून सर्व भिख्खू वर्षाचे 365 दिवस धम्म प्रचार व प्रसार करत असत. त्यांना 9 महिने कमी अडचणी येत असत. परंतु पावसाळ्यातील तीन महिने भिक्खुना खूप त्रास होत असे. ते गृहहीन होते. पावसाळ्यातील भयानक अडचणी लक्षात घेऊन बुद्धांनी भिख्खूनी व भिख्खूसाठी वर्षावासाचा निर्णय घेतला, तोही दिवस आषाढ पौर्णिमेचा होता. वर्षावासाची सुरवात आषाढी पौर्णिमेला होते.
- बुद्धांनी सारिपूत्ताना अभिधम्म शिकविण्याची सुरवात ज्या दिवशी केली तो दिवस आषाढी पौर्णिमेचा होता.
- प्रथम बुद्ध संगतीची सुरवात ज्या दिवशी झाली तो दिवसही आषाढी पौर्णिमेचा होता.
- भगवान बुद्धांच्या काळी सर्वसामान्य जनतेची भाषा पाली होती, पाली भाषा ज्ञान भाषा म्हणून प्रसिद्ध होती जगाचे कल्याण साधण्यासाठी भगवान बुद्धांनी महापरिनिर्वाणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत जो धम्म उपदेश सर्वाना केला तो पाली भाषेत होता. सर्व प्रथम बुद्ध वाणी लोकांसमोर आली ती पाली भाषेतच! हा दिवसही आषाढी पौर्णिमेचा होता, म्हणून आषाढी पौर्णिमेला 'पाली भाषा दिनही' म्हणतात. आणि जगात पाली भाषा दिन म्हणून आषाढी पौर्णिमा ओळखली जाते.
अशा प्रकारे आषाढ पौर्णिमेचे जगात अनन्यसाधारण महत्व आहे..!!"
लेखन / संकलन : दिपक धुंदाळे दिप्स ( विद्रोही विचारक ) 8668680173
हेही वाचा: